मला घोडे लावा, माझ्या मुलीचा काय दोष, तिच्या कपड्यावर कशाला बोलता? ट्रोलिंगने हैराण झालेल्या इंदुरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा निर्णय?
Breaking News | Indurikar Maharaj: टीकेमुळे इंदुरीकर महाराजांना मोठा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचं दिसून येत आहे.

अहमदनगर : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो,व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले, यावरुन त्यांच्यावर मोठ्या टीका देखील झाल्या, दुसऱ्यांना साधेपणानं लग्न करण्याचे उपदेश देणार महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात असं म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियातून व्यक्तीगत टीका झाल्या, या टीकेमुळे इंदुरीकर महाराजांना मोठा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचं दिसून येत आहे. परिणामी त्यांनी त्यांच्या एका किर्तनामध्ये याबाबतची खंत व्यक्त करत थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाहीत, आम्ही आमचा संसार किती कष्टातून मोठा केला याचा विचार लोक करत नाहीत, आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत, की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या, पण तिच्या बापाला…मला तुम्ही घोडे लावा.. माझा पिंड गेलाय… माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करुन टाकलंय. काय… मला एक सांगा.. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती?”.
पुढे इंदुरीकर महाराज म्हणाले की, “त्याच्यामुळे आता मी कंटाळलो महाराज. जवळजवळ मी दोन-तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप. थांबून घेणार आहे आता.. बास झाली ३१ वर्ष.. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ… माझ्यापर्यंत ठीक होतं, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना.. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही.. आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजेत. खरंय की खोटंय? तुम्ही काहीच बोलत नाही.. हे त्याने बंद केलं पाहिजे.. त्याला लाज वाटली पाहिजे, की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं जगावं. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता.”
रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आवाहन:
तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे आमच्या भगिनी बद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी, विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे सोशल मीडियावर वेड्याचे सौंग घेण्याकडे त्या वेड्याचे सौंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत. त्यांची विकृती ठेचून काढू. अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही. ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे. फेटा खाली ठेवायचा नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
इंदुरीकर महाराजांचा जावई कोण?
माहितीनुसार, साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे आणि शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे.इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही लोकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत.
Breaking News: Shocked by trolling, Indurikar Maharaj decides to quit kirtan















































