संगमनेरात दिल्ली नाका येथे तरुणांवर भ्याड हल्ला
Sangamner News: दिल्ली नाका परिसरात एका पान स्टॉलवर पान घेण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्याची घटना.
संगमनेर: संगमनेर मध्ये सातत्याने धार्मिक वादाच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा शनिवारी सायंकाळी घडल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील संवेदनशील असलेल्या दिल्ली नाका परिसरात एका पान स्टॉलवर पान घेण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे.
शनिवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला असून मारहाण करण्यात आलेले दोन्ही तरुण तालुक्यातील निळवंडे येथील असल्याची माहिती समोर येत आहे. समजलेली माहिती अशी, विकास बबन आहेर, विकास दीपक गायकवाड व निखील बबन बिडवे हे तरुण रात्री आपल्या गावी जात होते. संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात एका पान टपरीजवळ ते थांबले असता या ठिकाणी एका समाजातील जमावाने किरकोळ कारणावरून या तीन तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत हे तरुण जखमी झाले. जखमी तरुणांना त्वरित शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान संगमनेरात पोलिसांचा वचक संपल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहे. त्यातच सर्वच अधिकारी नवीन आहेत. शहराचे पुरेशी माहिती कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. माहितगार पोलिसांचा अभाव असल्याने शहरात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घटनेची माहिती समाज माध्यमाच्याद्वारे संगमनेरमध्ये पसरताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते व नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने शहरात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस काय पावले उचलतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे शहर पोलीस ठाण्यात आले. पोलीस ठाण्यात जमलेल्या संतप्त कार्यकर्त्यांची त्यांनी चर्चा करून शांततेचे आवाहन करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
दरम्यान घटनेची माहिती समजताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची भेट घेतली. यावेळी तरुणांच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध मोठा संताप व्यक्त केला. शांतता असलेल्या संगमनेरमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये, मारहाण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर शासन व्हावे असे थोरात म्हणाल्या.
Web Title: Cowardly attack on youth at Delhi Naka, atmosphere of anger
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News