तरुणांची डोके भडकविण्यासाठी काही लोक बाहेरून येऊन भाषण करतात: डॉ. जयश्री थोरात
Maharashtra Assembly Elections 2024 | Balasaheb Thorat vs Sujay Vikhe: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात आ. बाळासाहेब थोरात आणि माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या वाक युद्ध पाहायला मिळत आहे.
संगमनेर: आ. बाळासाहेब थोरात यांच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुका उभा राहिला आहे. येथील सहकार, शिक्षण, समाजकारण हे आदर्शवत आहे. मात्र हे बिघडवण्यासाठी आणि तरुणांची डोके भडकविण्यासाठी काही लोक बाहेरून येऊन भाषण करत आहेत. दादागिरी आणि दडपशाही काय असते हे त्यांच्या भाषणातून जनतेला कळत आहे. हा संगमनेर तालुका असून कुणाचीही दादागिरी सहन करत नाही, असे प्रतिपादन युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले. नगर-मनमाड रस्ता निष्क्रियतेची मोठी ओळख असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
चिखली, धांदरफळ, वडगाव लांडगा, जवळेकडलग, राजापूर येथे झालेल्या युवा संवाद यात्रेत त्या बोलत होत्या. यावेळी समवेत पदाधिकारी, नेते सोबत होते. डॉ. थोरात म्हणाल्या, संगमनेर तालुका हा स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असलेला तालुका आहे. मोठ्या कष्टातून हा तालुका उभा राहिला आहे. आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास हे राज्यासाठी आदर्शवत आहे. सुसंस्कृत राजकारण हे संगमनेर तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. तरुणांची चांगली पिढी घडवण्यासाठी काम केले जात आहे. मात्र बाहेरून येणारे लोक येथे माथी भडकवत आहेत.
नगर दक्षिणेमधून ज्यांचा निष्क्रियतेमुळे पराभव झाला, त्यांच्या निष्क्रियतेचे खड्ड्यात गेलेला नगर-मनमाड रस्ता हे सर्वात मोठे उदाहरण आहे. राहता तालुक्यातील सर्व सहकारी संस्था अडचणीत आहेत. ज्यांनी अनेक संस्था बंद पाडल्या ते आता विकासाच्या गप्पा करत आहेत. कुणी एक मारली तर दोन मारा, असे भाषणातून सांगणार्यांबद्दल विचार करण्याची वेळ जनतेवर आली आहे. हाणामारी आणि दडपशाहीचे राजकारण संगमनेर तालुक्यात नाही. त्यांचे राजकारण दोन चार भाषणांवरून जनतेला कळले आहे. एक महिन्यानंतर ते पुन्हा इकडे कोणाला दिसणारे नाहीत, अशी टीका डॉ.थोरात यांनी केली.
Web Title: Some people come from outside and give speeches Maharashtra Assembly Elections 2024
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study