अहमदनगर: विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: विजेचा धक्का बसून एका नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.
अहमदनगर : विजेचा धक्का बसून एका नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील आठरे पाटील बालगृहात घडली. साईराज गणेश भामरे (मूळ रा. हातगाव, ता. नगर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान नातेवाइकांनी बालगृहाच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
मयत मुलगा मूळ शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील आहे. तो नागापूर एमआयडीसी येथील निंबळकरोडवरील आठरे पाटील बालगृहात वास्तव्यास होता. वडील मयत झाल्याने त्याला नातेवाइकांनी बालगृहात दाखल केले होते. वसतिगृहात असताना साईराज याला विजेचा धक्का बसला. त्याला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान मयत मुलाच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत बालगृहाच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Web Title: Student dies due to electric shock
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study