संगमनेर: शेततळ्यात बुडालेल्या मुलांचा घातपात, ग्रामस्थांचा आरोप
Breaking News | Sangamner: शेततळ्यात बुडून दोन मुलांचा झालेला मृत्यू हा अकस्मात मृत्यू नसून तो घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी केला.
संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे (दि. १७) एप्रिल रोजी शेततळ्यात बुडून दोन मुलांचा झालेला मृत्यू हा अकस्मात मृत्यू नसून तो घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी केला आहे.
त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा उद्या (दि.२९) मे रोजी हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे निवेदन पाठविले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, (दि. १७) एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शेततळ्यात बुडून रितेश सारंग पावसे व प्रणव सारंग पावसे या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू अकस्मात नसून तो घातपाताचा प्रकार आहे. अनेकवेळा तालुका पोलीस स्टेशन व डी. वाय. एस.पी. कार्यालयातील संबंधीत अधिकाऱ्यांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही करूनही आश्वासना पलीकडे संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही कारवाई केलेली नाही.
त्यामुळे संबंधितावर कारवाई न झाल्याने हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी बैठक घेतली. या बैठकीत घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील गुन्हेगारांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास आज बुधवारी (दि.२९) हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थ पुणे-नाशिक हायवेवर टोल नाक्यावर रास्ता रोको करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.
Web Title: Victims of drowned children in the farm, villagers allege
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study