अहिल्यानगर: टेम्पोची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Crime: आयशर टेप्मो व दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला.
राहुरी: राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील दोन तरुणांचा पुणतांबा परिसरात झालेल्या आयशर टेप्मो व दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. अक्षय राजेंद्र बेलकर (वय 27) व महेश सुदाम हंडाळ (वय 29) दोघे रा. तांदुळवाडी, ता. राहुरी हे बुधवारी मित्राच्या विवाहासाठी पुणतांबा परिसरात गेले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमारास घरी परत येत असताना श्रीरामपूर-कोपरगाव राज्य मार्गावर पुणतांबा शिवारात त्यांची दुचाकी व आयशर टेप्पोची जोराची धडक झाली. या धडकेत अक्षय बेलकर हा जागीच गतप्राण झाला. तर महेश हंडाळ याला गंभीर जखमी अवस्थेत पाठीमागून येणार्या त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच महेश हंडाळ याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगीतले.
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील हे दोघेजण उडून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. आयशर टेम्पोचा चालक घटनेनंतर सुसाट वेगाने निघून जात असताना नातेवाईकांनी पाठलाग करून नायगाव शिवारात त्याला पकडले. काल गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात तांदुळवाडी येथील स्मशानभुमीत अक्षय बेलकर व महेश हंडाळ यांचा अंत्यविधी झाला. या अंत्यविधीस परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अक्षय बेलकरच्या पश्चात भाऊ, पत्नी, एक मुलगी, आजोबा तर महेश हंडाळ च्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तांदुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Breaking News: Tempo hits two-wheeler two youths die