अहिल्यानगर: पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी
Breaking News | Ahilyanagar Crime: तू पत्रकार आहेस म्हणून जास्त शहाणा झालास का, असे म्हणत शिवीगाळ करून पत्रकाराला ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

अहिल्यानगर : तू पत्रकार आहेस म्हणून जास्त शहाणा झालास का, असे म्हणत शिवीगाळ करून पत्रकाराला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार कोठला परिसरातील राज चेंबर्स येथे शनिवारी (दि. ९) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला. अन्सार राजू सय्यद (वय ५१, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) असे दमदाटी झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी बाबासाहेब बलभीम सानप (रा. वसंत टेकडी, सावेडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पत्रकार अन्सार सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. ते साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक आहेत. त्यांचे राज चेंबर्स येथे कार्यालय आहे. त्यांच्यासमोरच बाबासाहेब सानप यांचेही कार्यालय आहे. शनिवारी दुपारी फिर्यादी त्यांच्या कार्यालयामध्ये बसले होते. त्यावेळी तेथे त्यांचे ओळखीचे गणेश उरमुले आले. ते राज चेंबर्समधील शौचालयात लघुशंकेसाठी गेले होते. टॉयलेट धुऊन देण्याबाबत सानप यांनी उरमुले यांना सांगितले. त्यावरून उरमुले व सानप यांच्यात वाद झाले. हे वाद सोडवण्यासाठी फिर्यादी गेले असता तिथे सानप यांनी त्यांना धमकी दिली. तू पत्रकार आहेस म्हणून जास्त शहाणा झालास का? मी चांगल्या चांगल्यांना कामाला लावले आहे. पुढचा नंबर तुझा आहे, असे म्हणत सानप यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
Breaking News: Journalist receives death threat
















































