अकोलेत रस्त्याअभावी आदिवासी महिलेची जंगलातच प्रसुती
Breaking News | Akole: गावात पोहोचायला रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी महिलेची प्रस्ती जंगलातच उघड्यावर करावी लागल्याची धक्कादायक घटना. मुख्याध्यापक राजेंद्र गवांदे यांच्या मदतीमुळे बाळ-बाळंतीण पोहचले आरोग्य केंद्रात.
अकोले: गावात पोहोचायला रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी महिलेची प्रस्ती जंगलातच उघड्यावर करावी लागल्याची धक्कादायक घटना जांभळे (ता. अकोले) गावच्या शिवारात घडली. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही रस्त्याअभावी जंगलातच महिलेची प्रसुती होत असल्याची दुदैवी घटना घडत असल्याबद्दल सामान्य माणसांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, राजेंद्र गवांदे या मुख्याध्यापकाच्या धडपडीमुळे प्रसुतीनंतर लगेचच बाळ-बाळंतीण आरोग्य केंद्रात पोहोचले. त्यामुळे त्यांना पुढील उपचार मिळू शकले.
जांभळे गावाच्या ठाकरवाडीतील प्रतीक्षा दशरथ मधे या गर्भवती महिलेची जंगलातच प्रसुती करावी लागली, कारण बाडीपर्यंत जाण्यासाठीचा २ किलोमीटरचा रस्ता अद्याप पूर्ण विकसित झालेला नाही. या प्रसंगामुळे पुन्हा एकदा आदिवासी भागातील रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीची वेदनादायक वास्तवता समोर आली आहे. मुख्याध्यापक राजेंद्र गवांदे यांचे माजी विद्यार्थी दशरथ मधे त्यांच्या घरी धाव घेऊन आले. त्यांनी सांगितले की त्यांच्या बायकोची प्रकृती बिघडली असून, गाडी घेऊन लवकर ठाकरवाडीपर्यंत जाणे आवश्यक आहे. गवांदे तत्काळ आपली कार घेऊन निघाले मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता. परिणामी गाडी मध्येच अडकली. त्याचवेळी प्रतीक्षा मधे या गर्भवती महिलेला चालत चालत वाडीपासून रस्त्याच्या दिशेने आणत असताना घाटातच प्रसुती बेदना सुरू झाल्या, आसपास कोणतेही वैद्यकीय साहित्य नव्हते, परिस्थिती अत्यंत कठीण होती. मात्र त्यांच्या सासू, आई आणि वाडीतील एका महिलेने जंगलातच हिंमत करून सुरक्षित प्रसुती केली.
गवांदे यांनी बाळंतीण आणि नवजात बाळाला गाडीतून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला, पण गाडी चिखलात अडकली. त्यानंतर वाडीतील मित्रांनी मिळून गाडी ढकलून बाहेर काढली. दरम्यान, ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांच्याशी फोनवरून सतत संपर्कात राहून त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका पाठवली, अखेर सर्वजण सुखरूपपणे रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचले दरम्यान, नवजात बाळ आणि मातेची स्थिती स्थिर आहे. या घटनेने पुन्हा एकदा ठाकरवाडी रस्त्याच्या अपुन्या आणि अर्धवट अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
२०१५ मध्ये ग्रामपंचायतीने किलोमीटर लांबीचा घाटरस्ता सुरू केला होता, पण अपुऱ्या निधीमुळे काम थांबले. नंतर शासनदरबारी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला, पण वनविभागाच्या अडथळ्यामुळे रस्ता आजही पूर्ण होऊ शकलेला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या वाडीतील शेकडो आदिवासी बांधव अजूनही जंगलातील अरुंद पायवाटांनी, पावसाळ्यात चिखलात बाट काढत, आजारी मातांना डोलीने किंवा खांद्यावर उचलून दवाखान्यात नेतात. मुलभूत आरोग्य सेवा मिळण्यासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ त्यांच्यावर येते. परंतु, प्रतीक्षा मधे आणि तिचे नवजात बाळ सुखरूप आहेत, मात्र यावेळी सुदैवाने साथ दिली. पुढच्या वेळेस असाच प्रसंग आल्यास त्याचा परिणाम गंभीरही होऊ शकतो. शासनाने आणि प्रशासनाने या भागातील रस्त्यांच्या कामाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. रस्ता ही सुविधा नसून मूलभूत हक्क आहे याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.
सुदैवाने बाळ आणि आई दोघेही सुरक्षित आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाकरवाडीचा रस्ता केव्हा होणार? असा प्रश्न निर्माण झाला. सरकार दरबारी पाठपुरावा करूनही वन विभागाच्या अडचणीमुळे सुटत नाही. आजही आमचे आदिवासी बांधव अशा रस्त्याने प्रवास करतात, जेथे रस्ता अस्तित्वात नाही. २०१५ सालात ग्रामपंचायतीने हा २ किलोमीटर लांबीचा अवघड घाट स्ता करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अपुऱ्या निधीमुळे काम थांबले. यावरून दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांसारखे मुलभूत प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. जांभळे येथील घटनेने ही बाब आज पुन्हा अधोरेखीत झाली आहे.
Breaking News: woman gives birth in the forest due to lack of roads in Akole