Rajur News: शासनाकडून “हर घर तिरंगा’ अभियान (Har Ghar Triranga).
राजूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य उपक्रमात १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान शासनाकडून “हर घर तिरंगा’ अभियान देशात राबविले जात आहे. या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा, फडकवण्यासाठी नागरिकामध्ये जनजागृती करावी यासाठी मंगळवारी राजूर ग्रामपंचायतमार्फत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
राजूर ग्रामपंचायत सरपंच गणपतराव देशमुख व ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून राजूर ग्रामपंचायत, सर्वोदय विद्या मंदिर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय व परिसरातील विद्यालय यांनी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. गावातील मराठी शाळा येथून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्याचे स्मरण करून प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य बादशाह ताजणे, पर्यवेक्षक मधुकर मोखरे, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून प्रभात फेरीला प्रारंभ झाला.
यावेळी प्राचार्य मनोहर लेंडे म्हणाले, यंदा देशात आजादीचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. देशाने ७५ वर्षांत मोठी सर्वागीण प्रगती साधली आहे. देशातील व्यक्तींमध्ये देशप्रेम वृद्धिंगत होण्यासाठी हा महोत्सव घराराघरात साजरा होत आहे. तिरंगा ध्वज सामूहिक शक्तीचा अविष्कार आहे. संपूर्ण जगाला राष्ट्रीय एकात्मता शिकविणाऱ्या भारत देशाचा सर्वांना अभिमान आहे. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून घराघरावर तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी नागरिकांनी या महोत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Web Title: Dawn round in Rajur under ‘Har Ghar Triranga’