शिर्डीत मोदींची साद विकसित भारत करण्यासाठी साथ द्या, मराठा आरक्षणावर शब्दही नाही
Ahmednagar News: मुख्यमंत्र्यांसह इतर वक्ते आणि स्वत: मोदी यांनीही मराठा आरक्षणावर अवाक्षरही काढले नाही.
अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते येथे सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा आणि मराठा आंदोलकांनी बहिष्कार टाकण्याचा केलेला प्रयत्न या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या सभेकडे लक्ष लागले होते. मात्र, याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. खचाखच भरलेल्या सभेत मोदी यांनी केंद्र आणि राज्याची विकास कामे मांडली. २०४७ मध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी आपला देश जगातील विकसित राष्ट्र करायचा आहे, त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांसह इतर वक्ते आणि स्वत: मोदी यांनीही मराठा आरक्षणावर अवाक्षरही काढले नाही. या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा देणारे संभाजी बिग्रेड आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते.
मोदी यांनी शिर्डीत आल्यावर प्रथम साई समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर संस्थानतर्फे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक, भव्य दर्शन रांगेचे उद्घाटन केले. त्यानंतर निळवंडे धरणावर जाऊन जलपूजन आणि कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर शिर्डी विमानतळाशेजारी आयोजित सभेच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले. तेथे त्यांच्या हस्ते नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. सभेत बोलताना सुरवातीला त्यांनी ह.भ.प. बाबा महाराज सातरकर यांचा विशेष उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या महाराष्ट्रातील नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले ? काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले. आपल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ साडेतीन लाख कोटींचे धान्य आधारभूत किमतीवर खरेदी केले.
आम्ही एवढ्याच वर्षांत साडेतेरा लाख कोटींची खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे दिले, अशी तुलना करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत चौदा हजार कोटी रुपयांच्या आठ विकास योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खा. डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते.
विदेशांतील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साई संस्थानने १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शन रांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत महाराष्ट्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये टाकणार आहे. मोदींच्या हस्ते उद्घाटनसमयी १७०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले.
पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीत वळविण्यासाठी राज्याने प्रकल्प तयार केला आहे. याचा विदर्भ, मराठवाड्याला फायदा होईल, यासाठी केंद्राची मदत आवश्यक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठी भाषेतून भाषणाला सुरुवात करीत शिर्डीत साई शताब्दी महोत्सवाला आपण उपस्थित होतो व त्यावेळी भूमिपूजन झालेल्या दर्शनरांग संकुलाचे लोकार्पणही आपणच करीत आहोत; ही बाब पंतप्रधानांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद केली. ते म्हणाले, गरिबांचा विकास हे आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रेशन आणि घरांसाठी पूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत आम्ही सहापट अधिक निधी दिला आहे.
तुम्ही यापूर्वी केवळ घोटाळ्यांचे आकडे ऐकले. आम्ही विकास निधींचे आकडे ऐकवितो. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना तरसावले.
१९७० मध्ये मान्यता मिळालेल्या निळवंडे धरणाचे आज लोकार्पण झाले. आमच्या सरकारने गती दिल्याने हे शक्य झाले. महाराष्ट्रातील कृषिमंत्र्यांच्या काळात शेतकयांना दलालांवर अवलंबून राहावे लागत होते. आम्ही एमएसपी पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले, असेही ते म्हणाले.
Web Title: Support to develop India in Shirdi, not even a word on Maratha reservation
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App