भाजपा महाविकासआघाडीसरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार? कोर्टाच्या सुनावणीनंतर हालचालींना वेग
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती. याबाबत एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. या सुनावणी आमदारांना ११ जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे. १२ जुलै पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. यामुळे भाजपने चाचपणी सुरु केली आहे. आज सायंकाळी बैठक बोलाविण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह मविआच्या ५० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं याचिकेत म्हणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेनेने नोटीस पाठवली. याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना ५ दिवसात उत्तर देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत १६ आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. ११ जुलैला पुढील सुनावणी होईपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ११ जुलै ५.३० पर्यंत १६ आमदारांना नोटीसीला उत्तर देण्याची मुभा देण्यात आली आहे.
कोर्टाच्या या निर्णयानंतर भाजपाने आता मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे. कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपाकडून कायदेशीर चाचपणी सुरु करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडीविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची भाजपाची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.
Web Title: BJP will move no-confidence motion against Mahavikas Aghadi government