महसूलमंत्र्यांचा तालुक्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत
Sangamner | संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यातील महसूलमंत्र्यांचा तालुक्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई भासू लागली आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरुन खाली यावे लागत आहे. दरवर्षीच उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. मात्र, तेव्हा टँकर सुरू केले जातात.
संगमनेर तालुक्याचा पठार भाग म्हटला की दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळ असे समीकरणच बनले आहे. येथील अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांना सध्या कडक उन्हाळ्यात (Heat Wave) भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कधी पाण्यासाठी पायपीट तर कधी डोंगरदर्यात असलेल्या झर्याचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे. दरेवाडी येथील महिला तर कोसो अंतराची पायपीट करुन खोल विहिरीतून पाणी वाहून आणत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे पठारभागाला दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. भल्या सकाळीच दरेवाडी येथील बायाबापडे डोंगर उतरून खाली येतात आणि तेथे असलेल्या विहिरीतून पाणी ओढून पुन्हा डोक्यावर दोन-तीन हंडे घेवून पायपीट करतात. त्यातच पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारी करावी लागत असल्याने पाणी आणावे की कामाला जावे अशा दुहेरी संकटात येथील महिला सापडल्या आहेत. उन्हाची तीव्रता जसजशी वाढत चालली आहे तशा पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत शासनाने लवकरात लवकर आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी भागुबाई केदार यांच्यासह परिसरातील महिलांनी केली आहे.
Web Title: Heat Wave Citizens have to go to the taluka for water