धक्कादायक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Aurangabad News: विजेची तार बैलगाडीवर पडल्याने शॉक (electric shock) लागून दोघांचा मृत्यू.
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बायगाव शिवारात धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
बायगाव परिसरात सुसाट सुटलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे विजेचे तार बैलगाडीवर पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. साहेबराव गणपत चेळेकर (वय 70), लहान बंधू बाबुराव गणपत चेळेकर (वय 57) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चेळेकर बंधू एकत्र कुटुंबात राहतात. दरम्यान पाऊस बंद झाल्याने शेतातील कामासाठी दोन्ही भाऊ शेतात गेले होते. त्यांनतर संध्याकाळी शेतातील काम आटोपून साहेबराव चेळेकर लोखंडी बैलगाडी हाकत घराकडे निघाले. याचवेळी शेजारील एका शेतकऱ्याने विनाखांब नेलेली विजेची तार उंची कमी असल्याने साहेबराव यांच्या बैलाच्या शिंगात अडकली. यामुळे वीजप्रवाह बैलगाडीत उतरला आणि बैलासह साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला.
साहेबराव यांच्या बैलगाडीत वीजप्रवाह उतरल्याने घटनास्थळी मोठा आवाज झाला. त्यामुळे बाबुराव चेळेकर यांनी धाव घेत आपल्या मोठ्या भावाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र याचवेळी त्यांना सुद्धा विजेचा शॉक लागल्याने त्यांचा सुद्धा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी वीजप्रवाह बंद करून दोन्ही भावांना उपचारासाठी देवगाव रंगारी येथील रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Two brothers died due to electric shock